अलिबाग : देशासाठी त्याग, बलिदान देणाऱ्या सैनिकांच्या कार्याचा गौरव व्हावा, यासाठी नागावमध्ये एक ऋणानुबंध सोहळा आयोजित करण्यात आला. शहिद निलेश तुणतुणे यांच्या आई, वडीलांसह सेवानिवृत्त झालेल्या सैनिकांचा सन्मान मोठ्या उत्साहात करण्यात आला. वीर माता अनुराधा गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा विद्या गोखले यांच्या माध्यमातून बुधवारी(दि.5) झाला. या नाविन्य उपक्रमाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. सैनिकांच्या स्वागतासाठी वेगवेगळ्या रंगबेरंगी फुलांनी अच्छादलेल्या गालीचा तयार करण्यात आला.
या सन्मान सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून वीरमाता अनुराधा गोरे आणि सैन्य दलातील पॅरा, स्पेशल फोर्समधील पांडूरंग आंब्रे, सरपंच हर्षदा मयेकर, अमरनाथ राणे, डॉ. सुरेश गोरेगावकर, सेवानिवृत्त कॅप्टन उन्मेश वाणी, आदींसह सैन्य दलातील सेवानिवृत्त हवालदार कर्नल व नागावमधील ग्रामस्थ, उपस्थित होते.
देशासाठी आपले जीवन व्यतीत केले आहे, अशा आपल्या सैनिकांना आग्रहाचे आमंत्रण देऊन एकदा तरी घर पावन करावे. सैनिकांचा सन्मान होणे आवश्यक आहे. ही इच्छाशक्ती ठेवून विद्या गोखले यांनी हा सोहळा नागावमध्ये घडवून आणला. ऋणानुबंध नावाचा अगळा वेगळा कार्यक्रम घेऊन सैनिकांची देशभक्ती, त्याग, कर्तव्यनिष्ठा, आणि पराक्रमाप्रती आजच्या युवा पिढीमध्ये सैनिकांबद्दल आदर, प्रेम व देशसेवेची इच्छा व्हावी म्हणून हा कार्यक्रम नागाव येथील मांजरेकर कॉलनी येथे आयोजित करण्यात आला. विद्या गोखले यांच्या सैनिकांप्रती असलेल्या भावनांचा आदर म्हणून सरखेल कान्होजी आंग्रे सामाजिक संस्था, अखिल भारतीय पूर्ण सैनिक सेवा परिषद रायगड यांच्याकडून विद्या गोखले यांचा सन्मान करण्यात आला. या सैनिक सन्मान सोहळ्याचे निवेदक म्हणून वृषाली वर्तक यांनी काम पाहिले.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx