देश महाराष्ट्र
मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करीत आहेत. यात भाजपने बाजी मारली आहे. मात्र याच फोडाफोडी आणि कुरघोडीच्या राजकारणामुळे राज्यातील महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संबंध ताणले गेले आहेत. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाल्याचे दिसते. बिहार सरकारच्या शपथविधीवेळी दोन्ही नेत्यांकडून एकमेकांना टाळण्याच्या प्रयत्न झाला. हुतात्मा स्मारकाजवळील कार्यक्रमावेळी समोरासमोर आल्यावर शिंदे आणि फडणवीस यांनी केवळ औपचारिकता म्हणून एकमेकांना अभिवादन केले आणि दोघेही बाजूला झाल्याचे दिसले.
दरम्यान, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील रालोआ सरकारच्या शपथविधीदरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे हे एकमेकांवर नाराज असल्याचे दिसून येत आहे. सोहळ्यासाठी दोन्ही नेते वेगवेगळ्या विमानांमधून पाटणा येथे गेले. तर येथून येतानाही वेगवेगळ्या विमानांमधून परतले. मात्र, दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि फणडवीस हे एकाच विमानाने बिहारला गेले.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांचा जुना दोस्ताना आहे. मात्र, सामंत हे एकनाथ शिंदेंची बाजू सावरण्याचा फक्त ‘आव’ आणत आहेत, असा चिमटा शिवसेना (उबाठा) पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांनी काढला.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx