ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात ळ५ विकेट्सने विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघासमोर विजयासाठी ३३९ धावांचे मोठे लक्ष्य होते, जे त्यांनी ४८.३ षटकांत ५ विकेट्स गमावून पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या जेमिमा रॉड्रिग्जने ऐतिहासिक नाबाद १२७ धावा करून टीम इंडियाचे अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत भारतीय संघाचा सामना दक्षिण आफ्रिका संघासोबत होईल.
ऑस्ट्रेलियाची कर्णधार एलिसा हिलीने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. फोबी लिचफिल्डच्या ११९, एलिस पेरीच्या ७७ आणि अॅशले गार्डनरच्या ६४ धावांमुळे ऑस्ट्रेलियाने ३३८ धावा उभारल्या. त्यामुळे विजयासाठी ३३९ धावांचे लक्ष्य भारतासमोर होते. जेमिमा रॉड्रिग्जच्या शतक आणि हरमनप्रीत कौरच्या अर्धशतकाच्या जोरावर भारतीय संघाने हे लक्ष्य ५ विकेट्स शिल्लक असताना गाठले. जेमिमा १३४ चेंडूत १२७ धावा करून नाबाद राहिली, तर हरमनप्रीत कौर ८९ धावा करून बाद झाली, त्यांच्याशिवाय दीप्ती शर्माने २४, रिचा घोषने २७ आणि अमनजोत कौरने नाबाद १५ धावा केल्या.
© Desh Maharashtra. All Rights Reserved.
Designed & Developed by Securx